'तुका आकाशाएवढा' असे स्वतः तुकारामांनीच म्हटले आहे. आमचा निवास त्रिभुवनात असतो. आम्ही खरे म्हणजे वैकुंठात राहणारे, पण जनांचा उध्दार करण्यासाठी या पृथ्वीवर आलो, अशी त्यांची साक्ष आहे. आकाशाऐवढे तुकाराम अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असतात. त्यांच्या पिंडात ब्रह्मांड साठवलेले असते. एन्हवी पाहिले तर तुकाराम अगदी साधे कुणबी प्रवृत्तीचे दिसतात. धंदा नीट चालला नाही, घरी बायको तोंडाळ, घरात उपासमार, सर्वत्र फजितीचा प्रसंग, पण ईश्वरी योग असा की, संसारतापाने त्रस्त झालेले तुकाराम 'नित्य नवा दीस जागृतीचा' असा अनुभव घेऊन 'तुका झाला पांडुरंग' या अवस्थेला ते पोचले. मंजुळ व रसाळ वाणी त्यांच्या मुखातून स्त्रवू लागली. ते मराठी मनाचे एकमेव संतकवी बनले. तुकारामांचे व्यक्तिमत्त्व आकाशाएवढे कसे बनले ? या प्रश्नाचे उत्तर या लहानश्या पुस्तकात मिळेल.