खर सूर्यप्रकाशात दिसणार्या पावसाळ्यात धूक्याने आच्छादलेले शिखर आपल्याला खुणावतात. कारण धूक्याच्या आवरणामुळे त्यांना रहस्यमय बनवलेले असते. मानवी जडणघडण अशी असते की, त्याला नेहमीच अर्धवट दिसणार्या गोष्टींवरील पडदा उघडून त्यांचे गूढ जाणून घेण्याचा थरार अनुभवायचा असतो. हा नियम केवळ भौतिक जगतालाच लागू पडतो. असे नाही तर अगोदर, अपार्थिव जगातील गोष्टींबाबतही तितकाच लागू पडतो. मानवी मनाचे हे वैशिष्ट्य गेल्या शतकातील ख्यातमान लेखक श्री नारायण धारप यांनी अचूकपणे हेरले आणि उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय कथांचा मनोवेधक नजराणा वाचकाला भेट दिला. आपल्याला माहीत नसलेल्या अनुभवापलीकडच्या जगात काय असेल हे जाणून घेण्याच्या आपल्या उत्कट इच्छेला ते हळूवारपणे फुंकर घालून फुलवतात. त्यांच्या कथांमधून आपल्याला अपेक्षित नसलेल्या, आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा घटना एकापाठोपाठ वेगाने घडू लागतात आणि आपला या जगाशी असलेला संबंध तात्पुरता तुटतो. आपण त्या काल्पनिक जगात इतके गुरफटले जातो की, पुस्तक पूर्ण वाचून बाजूला ठेवेपर्यंत एका अनोख्या विश्वाचा भाग बनून जातो. धारपांच्या द्वैत या कादंबरीतील ठेंगू खलनायक अशीच वाचकांची उत्कंठा वाढवत जातो. कादंबरीतील विविध पात्रांच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकूण घटनाक्रमांचे विविध पैलू दिसत जातात. पाप आणि पुण्य या कल्पना अमूर्त आहेत, ॲजबस्ट्रॅक्ट आहेत; पण पापी स्वभाव ही गोष्ट खरी आहे, कारण ती एक घटना आहे. त्यामागे माणसाचा स्वभाव आहे आणि किंवा नसेलही; पण निसर्ग मात्र माणसाचा स्वभाव अवश्य कोरून ठेवतो आणि तोही कपाळासारख्या अशा एखाददुसर्या ठिकाणी नाही, तर शरीरातल्या प्रत्येक पेशीवर हा साचा उठवलेला असतो. क्रोमोसोमच्या रंगसूत्राची शृंखला आणि त्यातले जीन्सचे दुवे - त्यांच्यातच हे रहस्य दडलेले असते.