ही कथा आहे सामान्यातील एका असामान्याची. महत्पदावर चढलेल्या त्याच्या पुत्रांनी त्याच्या संबंधीच्या आठवणी - त्याच्याच शब्दात - ग्रथित केल्या आहेत. हे गृहस्थ पिताजी नव्हते. वडीलही नव्हते. तर सरळ, निर्मळ 'बाप' होते. बाप-मुलाच्या जिव्हाळ्याच्या नात्यावर प्रतिष्ठित शब्दांचे आवरण घालून त्यातील सहजतेचा गळा दाबणे त्यांना मान्य नव्हते. सहजता हेच खरोखर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या स्वभावाचे आधारसूत्र होते. दलित समाजात जन्माला येऊनही त्यांचा आत्मविश्वास कधी ढळला नव्हता, अथवा त्यांच्या लढाऊ बाण्याला ढळ पोचला नव्हता. 'किसी को डरना मत' हा मंत्र त्यांनी आपल्या मुलांना दिला होता, आणि तोच त्यांचा जीवनधर्म होता. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीने आणि विचारांनी ते प्रभावित झाले होते. त्यांनी जातीयतेची, लोकापवादाची, वरिष्ठांच्या अधिकारांची; आणि मुख्य म्हणजे दारिद्र्याचीही भीती कधी बाळगली नाही. त्यांचे जगणे काळोखावर मात करत पुढे जाणाऱ्या पेटलेल्या पलित्यासारखे होते. जिथे भयमुक्ती असते तेथे निरामय आनंदही असतो. सर्व प्रतिकुलावर मात करणाऱ्या अशा आनंदाची पेरणी आपल्या सुदाम्याच्या संसारात करीत ते जगत होते आणि सर्वांना जगवत होते. या आनंदाला सत्याचरणाची भक्कम बैठक होती. गोष्ट लहान असो वा मोठी, माणसाने खाटे-अप्रामाणिक वर्तन करता कामा नये हे त्यांचे ब्रीद होते. म्हणून त्यांनी लोकलमधून विनातिकिट प्रवास करू पाहणाऱ्या आपल्या मुलाला पाळत ठेवून पकडले आणि त्याला तिकिट काढायला लावले. अशा वातावरणात आणि संस्कारात, त्यांनी आपल्या मुलांना वाढवले. असा बाप मिळणे हे मुलांचे सद्भाग्य आणि अशी मुले मिळणे हे बापाचेही सद्भाग्य. सामाजिक सोपानाच्या अंतिम पायरीवर जन्मलेली मुले आज त्याच सोपानाच्या सर्वोच्च पायरीवर उभी आहेत. कोणत्याही क्षेत्रात जा, पण त्यात सर्वोच्च यश मिळवा ह्या त्यांच्या आदेशाचे त्यांनी पूर्णतः पालन केले आहे. त्यांनी अमेरिकेत संशोधन करणाऱ्या नरेंद्राला सांगितले होते, तुझ्या विद्वत्तेचा उपयोग रस्त्यातल्या सामान्य माणसाला झाला तर ते खरे, एरवी निरर्थक. असा हा बाप. प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणारा, त्यांची मने घडवणारा. मीपणाच्या बाह्यांगापासून दूर असलेला, आणि तरीही खूप मोठा असलेला. वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च पदावर असलेल्या त्याच्या पुत्रांनी त्यांच्या स्मृतीला वाहिलेली ही हृद्य श्रद्धांजली.